बेळगाव येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर व्याख्यान !

बेळगाव – अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. सध्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या जयशंकर भवन, शहापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या व्याख्यानाच्या प्रसंगी बोलत होत्या. या व्याख्यानाचा लाभ बेळगाव शहरातील अनेक जिज्ञासूंनी घेतला.

सद़्गुरु स्वाती खाडयेे यांनी साधनेचे विविध मार्ग, कलियुगात योग्य साधना कोणती आहे ? आणि कुलदेवता अन् दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी हिंदूंची सद्यःस्थिती, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी संकटे या संदर्भात माहिती देऊन त्यावर उपाययोजना सांगितल्या. उपस्थित जिज्ञासूंनी साधना सत्संग वर्गासाठी येण्याचा निर्धार केला.