योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या लक्ष्मीप्रसादाच्या नोटेच्या स्पर्शामुळे आलेल्या दिव्य अनुभूती

१. प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या नोटेचा स्पर्श मऊ लागून त्यांच्या चरणांना स्पर्श करत असल्याचे अनुभवणे आणि काही क्षण ध्यान लागणे

प.पू. दादाजी वैशंपायन यांनी २९.१.२०१४ या दिवशी माझ्या हातात दिलेल्या लक्ष्मीप्रसादाचा (१०० रुपयांच्या नोटेचा) पाठीमागील भाग पुष्कळ मऊ लागत होता. त्या वेळी मला प.पू दादाजींच्या चरणांना स्पर्श करत असल्याचा अनुभव आला आणि काही क्षण माझे ध्यान लागले. प्रत्यक्षातही कर्नाटकातील बाळेकुंद्री येथे मी त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला होता.

 

२. १४.२.२०१४ या दिवशी कुंडलिनी जागृतीसंदर्भात आलेली विलक्षण अनुभूती

२ अ. नोट पुन्हा हातात घेतल्यावर देहाचे विस्मरण
होऊन सर्व चक्रे विकसित होऊन प्रकाशमान झाल्याचे दिसणे

पुन्हा प.पू. दादाजी यांनी दिलेली १०० रुपयांची नोट हातात घेतल्यावर मला देहाचे विस्मरण झाले आणि माझ्या आतमध्ये एक अद्भुत प्रक्रिया होत असल्याचे दिसले. माझ्या मूलाधारचक्रात कुंडलिनी अत्यंत तेजःपूंज होऊन संपूर्ण जागृतावस्थेत प्रज्वलित झाली होती. सर्व चक्रे पूर्णतः विकसित होऊन प्रकाशमान झाल्याप्रमाणे दिसत होती. प्रत्येक चक्राचा आकार आणि रंग निरनिराळा होता. ती पारदर्शक आणि प्रकाशमान असल्याचे दिसत होते.

२ आ. जागृत कुंडलिनीतून निघालेला ॐ प्रत्येक चक्राला पार करून
सहस्रारातून अनेक होऊन बाहेर पडत असल्याचे दिसणे आणि मन प्रफुल्लित होणे

एकेक चक्र माझ्या डोळ्यांसमोरून उर्ध्व दिशेला जात होते.

२ आ १. अनाहतचक्र

ज्या वेळी माझी दृष्टी अनाहतचक्राकडे गेली, त्या वेळी त्या ठिकाणी श्रीकृष्ण विराजमान होऊन हसत असल्याचे दिसले.

२ आ २. आज्ञाचक्र

माझी दृष्टी आज्ञाचक्राकडे गेली. त्या ठिकाणी प.पू. गुरुदेवांच्या (प.पू. डॉक्टरांच्या) चरणांचे दर्शन झाले.

२ आ ३. सहस्रार

सर्वांत शेवटी सोनेरी रंगात प्रकाशमान असलेल्या झेंडूच्या फुलांच्या आकारातील ॐ सहस्राराच्या मध्यभागातून निघतांना दिसले. प्रत्येक चक्र चांदीच्या धाग्याने बांधलेले असून जागृत झालेल्या कुंडलिनीतून निघालेला ॐ त्या चांदीच्या धाग्याच्या मार्गातून प्रत्येक चक्राला पार करत सहस्रारातून अनेक होऊन बाहेर पडत होता.
हे सर्व दृश्य त्रिमिती चित्र असल्याप्रमाणे दिसत होते. माझे मन अत्यंत उत्साहित आणि प्रफुल्लित झालेले होते. माझा देह हलका झाल्याचे जाणवत होते.

३. प.पू. गुरुदेव आणि प.पू. दादाजी वैशंपायन हे बिंब-प्रतिबिंब आहेत, असे वाटणे

विश्व कुंडलिनीचे एक लहान प्रतिरूप प्रत्येक मनुष्यात असते; परंतु स्वभावदोष आणि अहंभाव यांमुळे ते सुप्तावस्थेत असल्याने त्याचे अद्भुत कार्य पहाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या अनुभूतीतून प.पू. गुरुदेव आणि प.पू. दादाजी वैशंपायन बिंब-प्रतिबिंब आहेत, असे वाटले. हा विचार मनात का आला, ते समजले नाही.
ही अनुभूती दिल्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या दिव्य चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.
केवळ आपली,
सौ. विदुला हळदीपूर, हुब्बळ्ळी, कर्नाटक.

 

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सेवेत असतांना साधकाने अनुभवलेला चैतन्यमय सत्संग !

 

सनातनच्या मिरज आश्रमात प.पू.दादाजी
यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना श्री. जयराम जोशी (२७.१.२०१४)

प.पू. दादाजी वैशंपायन मिरज येथील आश्रमात आले असतांना मला प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्यांच्यासारख्या महान संतांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! त्यांच्या सेवेत असतांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

१. शारीरिक गुणवैशिष्ट्ये

१ अ. त्वचा : प.पू. दादाजी यांची त्वचा लोण्यासारखी मऊ आहे.
१ आ. तोंडवळा : त्यांच्या तोंडवळ्यावर दिव्य तेज दिसून येते. त्यांच्याकडे एकटक पहातच रहावे, असे वाटते.
१ इ. हसणे : त्यांचे हसणे मधुर, गोड आणि मोहक आहे.
१ ई. सुगंध : त्यांच्या सहवासात मंद तारक सुगंध येत असतो.
१ उ. प.पू. दादाजी यांच्यामध्ये बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धावस्था अशा वेगवेगळ्या अवस्था दिसून येतात.
१ ऊ. प.पू. दादाजी सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात, असे जाणवते.

२. देहबुद्धी अल्प असणे

प.पू. दादाजी यांचे वय ९५ वर्षे आहे. वयोमानानुसार त्यांना जिना चढायला जमत नाही; म्हणून आम्ही आसंदीतून उचलून नेण्याची व्यवस्था केली होती, तरीही ते जिना चढून आले. याविषयी बोलतांना ते म्हणाले, जेवढे मला जमेल तेवढे मी चढतो. तसेच होमाच्या वेळी घंटोनघंटे ते भूमीवर मांडी घालून बसतात. २०.१.२०१४ या दिवशी ते बराच प्रवास करून आले, तरीही उत्साही दिसत होते. ते कधी थकले आहेत, असे दिसून येत नाही. त्यांच्यातील चैतन्यानेच सर्व होत आहे, असे जाणवले.

३. अहंचा लवलेश नसणे

एवढे उच्च प्रतीचे संत असूनही, तसेच उच्च शिक्षित असूनही त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. खरा रत्नपारखीच एखाद्या रत्नाची पारख करू शकतो. प.पू. दादाजी यांच्यासारखे अनमोल रत्न ओळखण्याची क्षमता उच्च प्रतीचे संतच करू शकतात. अहंचा लवलेशही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत नाही.

४. प.पू. दादाजी आणि प.पू. डॉक्टर म्हणजे बिंब-प्रतिबिंब !

प.पू. दादाजी किंवा प.पू. डॉक्टर यांनी दुसर्‍याला तुमच्यामुळे झाले, असे सांगितले, तर दोघेही त्याचे श्रेय एकमेकांना देतात. हे पाहून ते बिंब-प्रतिबिंब आहेत, असे वाटते.

५. प.पू. डॉक्टरांवरील दृढ विश्वास !

२४.१.२०१४ या दिवशी प.पू. दादाजी यांच्यासमवेत सांगली येेथील एका मंदिरात गेलो होतो. तेव्हा त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ नव्हता, तसेच तेथे अव्यवस्थितपणा होता. तेेव्हा प.पू. दादाजी म्हणाले, या मंदिराचे विश्वस्त परम पूज्य असते, तर मंदिराची स्वच्छता चांगली झाली असती.

६. प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव

६ अ. प्रवास चांगला झाल्याचे श्रेय प.पू. डॉक्टरांना देणे

मिरज आश्रमात आल्यानंतर प.पू. दादाजी यांना मी विचारले, आपला प्रवास कसा झाला ? काही त्रास झाला नाही ना ? तेव्हा ते म्हणाले, परम पूज्य समवेत होते ना !

६ आ. प.पू. डॉक्टरांसाठी विविध अनुष्ठाने करणे

प.पू. डॉक्टरांना बरे वाटावे, त्यांच्या कार्यातील अडचणी दूर व्हाव्यात, तसेच प.पू. डॉक्टरांचे आरोग्य व्यवस्थित रहावे, यासाठी प.पू. दादाजी पुष्कळ प्रयत्न करत असतात, उदा. वेगवेगळी अनुष्ठाने करणे, उपाय सांगणे
६ इ. प.पू. दादाजी यांना नाशिक येथे सोडल्यानंतर त्यांचा निरोप घेतांना ते मला म्हणाले, तू भाग्यवान आहेस. तुला प.पू. डॉक्टरांसारखे गुरु मिळाले.

७. देव संतांची काळजी घेतो, याची आलेली प्रचीती !

२८.१.२०१४ या दिवशी आम्ही प.पू. दादाजी यांच्यासमवेत नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. त्या दिवशी मंदिराकडे जाणार्‍या मार्गावरील सर्व दुकाने कसला तरी संप असल्यामुळे बंद होती. त्यामुळे आम्हाला मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत चारचाकी वाहन नेता आले. यावरून देवच कशा प्रकारे संतांची काळजी घेतो ? याची प्रचीती आली.

८. समाजातील लोकांना प.पू. दादाजी यांच्यातील संतत्वाची झालेली जाणीव !

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प.पू. दादाजी मंदिरासमोरील सभागृहातील आसंदीत बसले असतांना काही लोक येऊन त्यांना नमस्कार करत होते. २ – ३ जणांनी मला हळू आवाजात विचारले, कोणते महाराज आहेत ? तेव्हा समाजातील काही लोकांना प.पू. दादाजींच्या संतत्वाची जाणीव झाल्याचे लक्षात आले.

९. आलेल्या अनुभूती

९ अ. नागदेेवतेचे दर्शन होणे

अनुष्ठानाच्या वेळी प्रार्थना करत असतांना डोळे बंद केले, तेेव्हा नागदेेवतेचे दर्शन झाले.

९ आ. प.पू. दादाजी यांच्या रूपात दत्तगुरुच वाहनात बसले आहेत, असा भाव ठेवून सलग १५ घंटे वाहन चालवल्यावरही थकवा न येणे

आम्ही २९.१.२०१४ या दिवशी सकाळी ९ वाजता बाळेकुंद्री येथून नाशिक येथे जायला निघालो. प्रवास लांबचा असल्यामुळे आम्ही पुण्यात मुक्काम करायचे ठरवले होते; पण काही कारणास्तव आम्ही पुढे नाशिक येथे जाण्याचे ठरवले. रात्री ११.४५ वाजता नाशिक येथे पोहोचलो. सलग १५ घंटे वाहन चालवूनही मला काहीच त्रास झाला नाही. उलट उत्साहच जाणवत होता. प.पू. दादाजी वाहनात बसलेले असल्यामुळे मला वाहन चालवायला शक्ती मिळाली. त्यांच्या माध्यमातून दत्तगुरुच वाहनात बसले आहेत, असा भाव होता आणि तसेच मी अनुभवत होतो. त्यांच्या कृपेमुळे वाहन चालवू शकलो.

१०. प.पू. दादाजी यांनी साधकाचे केलेले कौतुक !

त्यांनीच सर्व केले आणि कौतुक मात्र माझे केले. ते म्हणाले, धन्य आहेस. १५ घंटे प्रवास करूनही मला काहीच त्रास झाला नाही. कुठेही धक्का किंवा हादरा बसला नाही. चांगले वाहन चालवलेस. तुला प्रशस्तीपत्र द्यायला हवे. तुला बक्षीस द्यायला हवे. (बक्षीस दिले) तुझे प्रमोशन करायला मी प.पू. डॉक्टरांना सांगीन. मी कृष्णाला आणि प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करत होतो, प.पू. दादाजी यांची सेवा तुम्हाला अपेक्षित अशी होऊ दे, तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या. त्यामुळे देवाने त्याची प्रचीती प.पू. दादाजी यांच्या माध्यमातून दिली, असे वाटते.

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, मिरज. (६.४.२०१४)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment