अपघातांपासून रक्षण होण्‍यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

साधकांना सूचना

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सनातनचे राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्‍यासाठी वाईट शक्‍ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्‍या आहेत. या वाईट शक्‍ती साधना आणि समष्‍टी सेवा करणार्‍या साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक अशा तिन्‍ही स्‍तरांवर त्रास देण्‍याचा प्रयत्न करत आहेत. या त्रासांमधील एक प्रकार म्‍हणजे गेल्‍या काही दिवसांपासून साधकांचे अपघात होण्‍याचे प्रमाण वाढले आहे, उदा. वाहन चालवत असतांना ते घसरून पडल्‍यामुळे दुखापत होणे, प्रसाधनगृहात किंवा अन्‍यत्र पाय घसरून पडल्‍यामुळे अस्‍थीभंग होणे किंवा घायाळ होणे आदी प्रकारच्‍या त्रासांमुळे साधकांना अनेक दिवस विश्रांती घ्‍यावी लागत आहे. त्‍यामुळे त्‍यांना गुरुकार्य करण्‍यात अडचणी येत आहेत. वाईट शक्‍तींनी साधकांना कितीही त्रास देण्‍याचा प्रयत्न केला, तरी ईश्‍वर वाईट शक्‍तींपेक्षा अनंत पटींनी सामर्थ्‍यवान असल्‍यामुळे तो साधकांचे रक्षण करणारच आहे. साधकांनी मात्र वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी साधना आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय वाढवणे अत्‍यावश्‍यक आहे.

विविध प्रकारच्‍या अपघातांपासून रक्षण होण्‍यासाठी साधकांनी उपास्‍य देवतेला प्रार्थना करावी आणि वैयक्‍तिक नामजपासह पुढील नामजप करावा.

१. नामजप : महाशून्‍य

२. न्‍यास : ओठांच्‍या समोर १ – २ सें.मी. अंतरावर उजव्‍या हाताचा तळवा धरणे

३. कालावधी : १ मास प्रतिदिन १ घंटा

सर्व साधकांनी वरील नामजप १ मास प्रतिदिन १ घंटा केल्‍यावर त्‍याच्‍या परिणामाचा आढावा घेण्‍यात येईल आणि ‘पुढे हाच नामजप ठेवायचा कि पालटायचा ?’, ते ठरवून साधकांना पुन्‍हा सूचना देण्‍यात येईल.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (२.८.२०२४)

Leave a Comment